मंगळवार, ३० जून, २०२०

पचमढी-एक प्रवास वर्णन

                                                 पचमढी-एक प्रवास वर्णन
                                      " पचमढी"---सातपुडयाची "राणी"
                                                    

                               संपूर्ण भारतवर्षात हिल स्टेशनची काहीच कमी नाही.उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळ्या भागात अनेक हिल स्टेशन सुप्रसिद्ध आहेत. पण मध्य भारतात ,त्यातही मध्यप्रदेशात असलेलं एकमेव हिल स्टेशन म्हणजे पचमढी .सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील ,निसर्गरम्य ,अतिशय मनोहारी ,विविध रंगाच्या ,ढंगाच्या, फुलं-वृक्षांनी बहरलेलं व वर्षभर हिरवेगार असणार नितांत सुंदर, स्वर्गीय पचमढी !आणि म्हणून तर याला "सातपुड्याची राणी" होण्याचा गौरव प्राप्त झाला तो उगीचच नाही.
                            नागपूरपासून फक्त २२५ किलोमीटर दूर असलेलं पचमढी व तितकेच दूर असलेलं चिखलदरा कधी शाळेच्या "ट्रिप"बरोबर गेलेली हि ठिकाण इतक्या जवळ असूनही आपण का बर गेलो नाही ?हा विचार करता खरच आश्चर्य वाटते. बराचसा भारत ,किंबहुना परदेश दौरा सहज करून आलेलो आपण इतक्या दिवसात हि निसर्गाशी एकरूप झालेल्या ठिकाणांना आपण भेट दिली नाही म्हणून मन थोडं खट्टू पण होत होते , तरी "घर कि मुर्गी दाल बराबर" 
 असच काहीतरी मनात ठेऊन समाधान करत "देर आये दुरुस्त आये "या भावनेने सलग एक वर्षाच्या अंतराने ह्या दोन्ही पर्यटन स्थळांना आम्ही आवर्जून भेट दिली .स्वतःचा,बायकोचा वाढदिवस ,लग्नाचा वाढदिवस या विशेष दिवशी बाहेर कुठेतरी आम्ही जातोच (घरी राहून नको त्या आठवणी काढत वादावादी टाळणे हा त्या मागचा उदात्त विचार असू शकतो!),अगदी कार्यव्यस्ततेमुळे नाहीच कुठे जमले तर नजीकच्या रिसॉर्टला ,पण जाण मात्र नक्की. या वेळला लग्नाचा वाढदिवस पचमढीला साजरा करायचाच हि खूणगाठ मनाशी बांधून तयारीला लागलो .
                                                                         
                              फिरायला जाताना पैश्याची उधळपट्टी नाही पण अगदीच काटकसर करून जायचं म्हणजे  प्रवासाची मजा कमी करून घेणे ह्या विचारांवर मी ठाम असल्याने पचमढीला भाडेतत्वावर कार घेऊन जायचे ठरले व मध्यप्रदेश पर्यटन विभागाचा बंगला आधीच आरक्षित करून ठेवलेला होताच,त्यामुळे एक निश्चितता होतीच ,
ठरल्याप्रमाणे सकाळी सातच्या ठोक्यालाच गाडीवाला हजर झाला,रामदास त्याच नाव ,मराठी माणूस ! बहुतेक ड्रायव्हर असतात तसाच. अतिशय "चोम्बडा",तितकाच बडबड्या पण त्यामुळे प्रवास व स्थळ दर्शन तसंच चांगलं खाण ,ह्या सगळ्या गोष्टींची खडानखडा माहिती असलेला मोफत गाईड मात्र आपल्याला सहजासहजी मिळतो ,त्यामुळे मला प्रवासात तरी असलेच ड्रायव्हर "प्रिय"असतात. नशिबाने सुरवात तर चांगली झाली म्हणून मी खुश होतो. जेमतेम कोरडी आल्याबरोबर गाडी रस्ता सोडून आपलं खाद्य अर्थात पेट्रोल भरायला व हवा चेक चेक करायला थांबली. (हि सगळ्या ट्रॅव्हल कंपनीची नेहमीची खोड ,कुठे गिऱ्हाईकाला एकदम पॆसे देणे जीवावर आलं तर ?म्हणून हे टप्प्याटप्प्याने वसुली करणार ) सगळी चाक टक टक करून बघितल्यावर चला साहेब म्हणताच टगळ-मंगळ करीत अख्ख्या पेट्रोल पंपाची पाहणी करणारी आमची स्वारी गाडीत बसली ,आता कुठे थांबायचं नाही अशी आस्वाशक सूचना देत स्वतःची  व आमची व्यवस्थित ओळख करून घेण्याचं त्याच काम मात्र चालूच होत.
                                                                           
                           नागपूर-छिंदवाडा  चार पदरी महामार्गावरून (गडकरींची कमाल ह्या रस्त्यावरून जाताना सहज लक्षात येते )गाडी सुसाट वेगाने जात होती महाराष्ट्र सीमेवरील शेवटल मोठं गाव केळवद सोडून आता आम्ही मध्यप्रदेशात पोहचलो होतो,इतक्यात आलेली बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील "पहाटेचा शपथविधी" मोबाईलमधून डोकं वर काढू देत नव्हता व एक चांगली बातमी मिळाली म्हणून थोडं सुखावल्यासारखं वाटत होत. आता, रस्त्यावरील एक दोन वसुली पथक अर्थात टोल-नाके पार करत आम्ही सौंसरच्या आधी असलेल्या जामसावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनाला गेलो.अतिशय जागृत व प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात हनुमंताची मूर्ती भद्रा अवस्थेत असून अतिशय सुंदर व भव्य मंदिर आहे.
                                                                         
                       जामसावली वरून लागलीच आपण सौंसर ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचतो, गावाच्या आधीच आमचं पितृक गाव "मोहगांव” ची पाटी  बघून आजही आम्ही मालगुजार आहोत या स्वप्नात असतानाच सौंसर  बस स्थानकाच्या चक्क आत गाडी थांबल्यावरच स्वप्नातून जागे झालो. नागपूर किंवा छिंदवाडा वरून येणारे बहुतेक प्रवासी या बसस्टँडवर थांबून चहा व तर्री-पोह्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे सरकत नाहीच.पोहे त्यावर झणझणीत तर्री ,बारीक चिरलेला कांदा ,शेव,कोथींबीर हि नागपुरी लोकांची आवडीची व हक्काची डिश,सोबत गरम-गरम कांदा-मिरची भजे यांचा मनमुराद आस्वाद घेऊन पूर्ण क्षुधा-शांती करून मस्त वाफाळलेला आल्याचा चहा घेऊन पुढे मार्गस्थ झालो.
                                                                           
                       पूर्वी मध्यप्रदेशातले रस्ते हा एक विनोदाचा विषय होता पण आता महाराष्ट्राला लाजवेल इतके सुंदर रस्ते आम्हाला थेट पचमढी पर्यन्त मिळाले ,रस्त्यानी जाताना पेंच कॉरिडॉरचा एक भाग असल्यामुळे जंगल बऱ्यापैकी दिसत होते छिंदवाड्याचा घाट पार करत असताना साग ,साल बांबू ची उंच उंच झाडे ,खोल दऱ्या ,काही ठिकाणी मुद्दाम बनवल्या गेलेले "व्हिव्यू "पॉईंट बघत वन विभाग ,बांधकाम विभागाच्या सूचना जंगल व प्राणी संवर्धनाचे दगडांवर काढलेली चित्रे बघत वेड्या-वाकड्या वळणांवरून आमचा मार्गप्रवास सुरु होता इथे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वानरसेना रस्त्यांच्या कडेला दिसत होती . अनुभवाने रामदासाने सौंसर वरून फुटाण्याचे पाकीट आवर्जून घेतले होते ,ते व केळी ह्या रामदासाने ,रामाच्या दासांना गाडी थांबवून यथेच्छ खाऊ घातली ,वन विभागाच्या सुचनांचा आदर करायचा हे त्याच्या लेखी नव्हतेच ,माझं शहरी मन उगाचच शहाणपण सांगण्याचा प्रयत्न करत होत पण त्याच "प्राणीप्रेम"याला भीक घालत नव्हते पण त्यांची खाण्याची तगमग ,छोटी छोटी पिल्यांची मस्ती बघून मन मात्र नक्कीच हरखून गेले.
                                                                             
                               छिंदवाड्याच्या बाहेरूनच परासिया बायपासने आम्ही परासिया शहराच्या आधीच पचमढी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. थोडं अंतर पार केल्यावर तामिया गाव लागते. निसर्ग किती सुंदर असावा ,हे बघायचं असेल तर तामियाला नक्की जावंच. इथे असलेल्या पीडब्ल्यूडीच्या विश्राम गृहातून ,सातपुडा, पचमढीच विलोभनीय दर्शन  घडते. इथला सनसेट बघायला नेहमीच गर्दी असते. तस तामिया हे एक पचमढीसारखंच निसर्गरम्य स्थळ ,त्यामुळे मध्यप्रदेश टुरिझम ,खासगी हॉटेल -मोटेलची ,धाब्याची खूप रेलचेल आहे.गुप्त महादेव ,निसर्गनिर्मित धबधबे,दाट झाडांनी आच्छादिलेले पर्वत दऱ्या ,पाताळकोट (आदिवासी जमिनीच्या खाली म्हणजे पाताळात राहतात,सर्व भौतिक परिघाच्या बाहेरील त्यांचे जीवन इथे दिसते.रामायणातील मेघनाद जेव्हा पाताळात होता ते ठिकाण हेच अशी आख्यायिका आहे.)हि सर्व प्रेक्षणीय स्थळे बघण्याकरिता मुद्दाम वेगळा वेळ काढावा लागेल पण पचमढीच्या तुलनेत इथला निसर्ग जास्तच भावून गेला ,ते परत यायच्या निश्चयानेच!
                                                                     
                             तामिया पार कडून, आम्ही लवकरच पचमढीला पोहचतो आहे हे दिशादर्शक फलकांवरून सहज लक्षात येत होत. पचमढीचा घाट पण खूप छान आहे ,दोन्ही बाजूला जंगल .व,सापाच्या चालीसारखे वर खाली जाणारे रस्ते बघून  मन  प्रफुल्लित होत होते .पचमढीच्या आधी रस्त्याच्कया  कडेने ३००-४०० जवानांचा ताफा  रूट मार्च करीत जाताना दिसला ,एका लयीत ,शिस्तबध्द चालणारे सगळेच पोरसवदा जवान होते,नवीन "रंगरूट" असावेत ,प्रशिक्षणाच्या कुठल्यातरी भागाचा त्यांचा हा रूटमार्च खूपच विलोभनीय दिसत असताना ,मनात देशप्रेमाची भावना अनावर होत ,कळत नकळत हात त्यांना "स्यॅल्युट "मारून गेला .थोड्या अंतरावर एका विशिष्ट्य पद्धतीने बांधलेले त्यांचे तंबू तितकेच शिस्तबद्ध व एक अंतर ठेवून एकाच लाईनीत बघताना मिलट्रीच्या शिस्तीला एक कडक सलाम मात्र केल्या गेला.
                        आमचं निवासस्थान आधीच आरक्षित केल्यामुळे थेट तिथेच पोहचलो.आफिसमध्ये कागदपत्रांची सगळी पूर्तता केल्यावर आम्हाला खोलीचा ताबा दिला, सामान खोलीत ठेवणाऱ्याच्या हातात बळे बळेच शंभर रुपयाची नोट ठेवल्यावर स्वारी भलतीच खुश झाली व भर बारा वाजता न मिळणारा चहा तोही एकदम फक्कड त्याने लागलीच पोचवून दिला. मुळात, कुठेही प्रवास करताना, ड्रायव्हर,रुमसर्व्हंट ,वेटर यांच्याशी हात सढळ सोडल्यावर जी विशेष "सेवा"आपल्याला पटकन मिळते त्याला तोड नसते ,काउंटरवर विराजमान असलेल्या मॅनेजरला दहा वेळा सांगून जी काम होत नाही ती हे लोक क्षणाचा विलंब न करता सहज करतात म्हणून "आधी दाम मग काम "हे शास्त्र अनुभवांनी मला चांगलेच अवगत झाले आहे अगदी परदेशवारीत सुध्दा!
                                                                       

                             पचमढी हिल स्टेशन मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात सुमारे ३५०० फूट उंचीवर आहे,नेहमीसारखाच ब्रिटिशांनी हे ठिकाण शोधलं,तिथे आपलं बस्तान बसवलं त्यामुळे  इथे ब्रिटिशकालीन बंगले खूप आहेत .स्वातंत्र् मिळाल्यावर सर्व राज्य सरकारांनी ते ताब्यात घेऊन त्याचे टुरिस्ट बंगले,शासकीय निवासस्थान ,ऑफिसेस चांगल्या  पद्धतीने करून घेतले. मध्यप्रदेश पर्यटन विकास निगमच्या आमचा ":देवदारु "बंगला पण याच पठडीतला!मोठ्या उंच खोल्या, व्हरांडा,समोर सुंदर बगीचा ,झोपाळे ,बाजूलाच रेस्टारेंट अश्या सगळ्या सुखसोयीने ,सुसज्य व जुन्या काळातील वास्तूचा पुरेपूर आनंद देणार हे निवास्थान बघितल्याबरोबर त्याच्या प्रेमात पडावं असं!आजूबाजूच्या एक-दीड किलोमीटर परिसरात अमलताश,चंपक,ग्लेन व्हीव्यू ,हिलटॉप,कर्णिकार,सातपुडा, क्लब हाऊस अशी कितीतरी बंगले असेच निसर्गाच्या सानिध्यात नटलेले बघूनच छान वाटावं,थोडे पैसे जरी जास्त मोजले तरी किमतीच्या अनेकपट मनःशांती देणारे हे बंगले पचमढीचे सौन्दर्य अजूनच खुलवतात.
                                                                             
                     पचमढी हे जुन्याकाळी गोंड राजाची अधिसत्ता असलेलं व आपल्या लष्करी हालचालींना उत्तरेत जाताना सोयीचं पडावं म्हणून ब्रिटिशांनी विकसित केलेलं ठिकाण.! आजही" पचमढी कँन्टाॅन्मेंट "इथला कारभार बघते .भारतीय सेनेचे मध्यभारतातील एक मोठे केंद्र व संपूर्ण भारतातील सैन्य दलाचे "आर्मी एजुकेशनल कोअर"चे मुख्यालय इथे आहे.अनेक "सॅनोटोरियम" ब्रिटिशकाळापासून इथे दिसतात,बोटिंग,पॅराग्लायडींग,ऍडव्हेंचर कॅम्प ,ट्रेकिंग साठी योग्य असलेले हे ठिकाण ,वनऔषधीच्या बाबतीत अतिशय संप्पन आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळ ,तसेच धार्मिक पर्यटनाकरता प्रसिद्ध हे ठिकाण वरील बाबींकरीता सुद्धा पर्यटकांचे आवडते स्थान ठरत आहे. मुबलक निवास व्यवस्था ,उत्तम व सगळ्याप्रकारचे खाणे त्यामुळे पर्यटकांचा ओढा इकडे सहज वळताना दिसतो.
                  पचमढीच पर्यटन हे मुख्यत्वे दोन प्रकारात विभागता येईल ,एक धार्मिक पर्यटन ,तर दुसरे निसर्ग पर्यटन. त्यातही आपली गाडी घेऊन जाता येणारी स्थळ व काही पर्यटन -फॉरेस्ट विभागाची परवानगी, तिकीट ,घेऊन जाणारी स्थळ ,यात जिप्सी,गाईड ,प्रवेश शुल्क इ. सगळं समाविष्ट असत. मुळात हि माहिती असली कि कुठे आणि कस जायचं हे आपण व्यवस्थित "प्लॅन"करू शकतो. एकूण दोन रात्रीच्या थांबण्यात बहुतांश पचमढी दर्शन आपण पूर्ण करू शकतो.
                                                                                 
                 नोव्हेंबरचा शेवटला आठवडा असल्याने चांगलीच कडाक्याची थंडी पण अतिशय आल्हाददायक थंडी होती ,सगळा लवाजमा म्हणजे स्वेटर,कानटोपी ,जर्किन ,शॉल बरोबर असल्याने चांगली सोय झाली होती ,या सोयीवरून आठवलं ,एक मजेदार किस्सा घडला. रात्री जेवायच्या आधी रामदासला म्हंटलं अरे, थंडी खूप आहे जवळपास काही "सोय"आहे का?लिकर कुठे मिळेल ,त्याला समजावं म्हणून सोप्या भाषेत विचारले, हे महाराज मार्केटमध्ये खूप दुकान आहेत,मी दाखवतो न, असे नेहमीप्रमाणे म्हणाले, म्हणून मी आनंदाने गाडीत बसलो,भर बाजारात गल्ली-बोळातून ,चढ उतारावरून एका ठिकाणी गाडी उभी करत त्याने समोरचे दुकान दाखवले,दुकानावर ,बाहेर सगळ्या व्हीआयपी ,जॉकी ,माचो इ जाहिरातींचे फलक दिसत होते म्हणटल ,असते एकेका गावाची पद्धत,कुठे तरी कोपच्यात आतमध्ये असेल दुकान,मोठ्या  उत्साहाने आत शिरलो व दोनच मिनटात बाहेर पडलो,तोंड वेडेवाकडे करत ,याला खाऊ कि गिळू या अविर्भावात बघत असताना हे स्टेअरिंगवरच डोकं शांतपणे वर उचलत निर्विकारपणे विचारते झाले,भेटलं का साहेब?लवकरच आले !मी म्हंटल अरे मुर्खा,तू मला कुठे पाठवले?तेवढ्याच शांतपणे तो म्हणाला साहेब तुम्हाला "निकर "हवी होती ना?मी कपाळावर हात मारून घेतला,हा घोळ शब्द खाली पडू न द्यायच्या तत्पर सेवेने केला."लिकर" आणि " निकर" या साधर्म्यामुळे आमचा चांगलाच "पोपट"मात्र झाला अर्थात नंतर ,पचमढीतील एकमेव असणाऱ्या दुकानात नेऊन त्याने  आमची "सोय"छान केली तो भाग अलहिदा !
                                                               
                पचमढी हे नाव पाच मरही म्हणजे पाच गुंफा वरून पडले त्या "पांडव गुंफा" येथून आपण सुरवात करू या, वनवासात असताना पांडव इथे वास्तव्याला होते अशी वंदता आहे म्हणून याचे नाव "पांडव गुंफा" पण पुरातत्व विभागाच्या मते हे बौद्ध भिक्कूंचे राहण्याचे ठिकाण होते. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या गुंफा नेहमीप्रमाणेच अर्ध्याच बघायला मिळतात ,बाकी बंदच आहे. पायथ्याशी अतिशय रमणीय ,"मेंटेन"केलेला मोठ्ठा   बगीचा आहे पचमढीचा निसर्ग इथे ओथंबून वाहत असल्यासारखा दिसतो,बाहेर मैदानात मोठ्या चाकाच्या बाईक्स,सवारीसाठी उंट,घोडे बॅटरीवर चालणाऱ्या बाइक्स भाड्याने मिळतात ,आम्ही सुद्धा स्वयंचलित बाइकवर सवारी घेण्याची मजा मोकळ्या मैदानात मनसोक्त घेतली.
                           
                                                                         
                           "जटाशंकर" हे स्थान हि गुहेत आहे. बरेच चढून इथे पोहचावे लागते. भगवान शंकर भस्मासुराकडून बचाव करण्यासाठी कैलास पर्वतावरून इथे राह्यला आले अशी आख्ख्यायिका आहे. मूळ स्वरूपातले शिवलिंग इथे आढळते, मंदिराच्या आत  पाण्याचे कुंड असून कुठल्यातरी नदीचा प्रवाह किंवा उगम असल्यासारखा वाटतो,पहाडाच्या आत असलेल्या इथल्या खडकातून सतत पाणी झिरपत असते. खडकांच्या आत असलेल्या गुंफेत मंदिर आहे,शेषनागाच्या फण्यासारखे किंवा शंकराच्या जटेसदृश्य दिसणाऱ्या खडकांच्या आत मंदिर असल्यामुळेच याला "जटाशंकर"हे नाव पडलं असावं ,याचा उल्लेख थेट शिवपुराण तसेच नर्मदा पुराणात आढळून येत असल्याने याचे विशेष महत्व आहे. इथल्या खडकांवर अजूनही समुद्रातील रेती ,शंख -शिंपल्यांचे अवशेष दिसतात ,अति प्राचीन काळी हा समुद्राचा भाग असावा असे अभ्यासकांचे मत आहे. रस्त्यात सगळ्या आजारावरची कधीही न बघितलेली वन औषधींची ,मधाची,  विपुल दुकाने दिसतात, थोडीफार खरेदी उत्सुकतेपोटी केल्या जातेच. खोडासारखा मोठा कंद "रामकंद"म्हणून विकायला एक जण बसला होता,त्याचे मोठे मोठे पांढरे शुभ्र काप दिसायला व खायला खोबऱ्याशी  मिळते जुळते दिसले इथे जाण -येणं म्हणजे एक छोटं "ट्रेकिंग"केल्याची अनुभूती नक्की मिळाली.
                                                                       
                                                                     
                            "बडा महादेव" हे ७-८ किलोमीटर लांब असलेले शिवाचे मंदिर आहे, लांब गुंफेत वसलेले जुने  मंदिर खडकाच्या आत वसले आहे गुंफेत असणारा अंधार ,खडकातून पडणारे पाणी एक वेगळा अनुभव देउन जातो, आतमध्ये वाकून जावं लागते ,आतमध्ये पाण्याचे छान कुंड आहे. आतमध्ये अतिशय थंड वाटणारे हे ठिकाण पुरातन स्वयंभू शिवलिंगामुळे दर्शनीय तर आहेच शिवाय श्रद्धेने येणारे भाविक त्यामुळे सतत गर्दी करून  असतात. ह्या मंदिराच्या  बाजूलाच अजून एक गुंफा आहे,इथे सुद्धा शिवलिंग असून खडकातून सतत पाणी वाहत असते.   नवस पूर्ण करायला इथे दगडांवर दगड रचून पूजा केली जाते,गुंफेत असे लगोरी सारखे रचून ठेवलेले दगड मोठ्या प्रमाणात आढळतात.
                                                                           
                    "गुप्त महादेव"हे बडा महादेवपासून जवळ आणखी एक महादेवाचे पुरातन मंदिर आहे.बाहेरच हनुमंताची भव्य मूर्ती विराजमान असून खडकांच्या मध्ये असलेल्या एकदम चिंचोळ्या जागेतून गुंफेत जावं लागते ,जागा इतकी चिंचोळी   आहे कि या जागेतून सरळ न जाता आडवे होत जावे लागते. गुंफा पण खूप लांब आहे,इथेही सगळीकडे खडकातून पाणी झिरपत असते. ह्या गुंफेतून थेट जटाशंकर गुंफेपर्यंत महादेव बारा किलोमीटर अंतर नागरूपात गेल्याची आख्यायिका ऐकायला मिळते
                                                                         
                   "चौरागढ "हे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर पंचमढीपासून ६-७किलोमीटर दूर वसलेले आहे,अतिशय उंचीवर असलेले हे मंदिर पचमढीच्या बराचश्या स्थळावरून लांबवर दिसत असते. भाविकांची आत्यंतिक गर्दी असणार व जागृत असणाऱ्या या मंदिरात महाशिवरात्री,नागपंचमीला यात्रा असते .चढण्यास अत्यंत कठीण व जवळपास १३५०पायऱ्या असलेला मार्ग सलग नाही मधेच खडकाळ रस्ते, मातीचे ओबडधोबड रस्ते ,कधी सरळ मार्ग खाली उतरत कधी वर चढत आपण मंदिरात पोहचतो,रस्त्यात भाविकांसाठी पाणी नाश्ता,जेवण त्यातही मक्याची चुलीवरची भाकरी बरोबर टमाटोची चटणी सहज मिळते.मंदिर बरचस आधनिक पद्धतीने बांधलेले दिसते ,इथे शंकराला त्रिशूल अर्पण करायची पद्धत असल्यामुळे ,त्रिशूल जागोजागी खोचलेले दिसतात व एक वेगळेच दृष्य बघायला मिळते. विशेषतः नागपूर व मध्यप्रदेशातून भाविक "महादेवाला"चौरागढ व नागद्वारला नागपंचमी आणि महाशिवरात्रीला यात्रेला येत असतात या ठिकाणी आल्यावर "पोहा चाल्ला महादेवा"अशी स्वाभाविक आठवण झाली.
                                                             
                    " नागद्वार"हे पचमढीपासून १५-२० किलोमीटर दूर असणार अति दुर्गम ठिकाण. नागपंचमीच्या निमित्त्याने लाखो लोक इथली पायी यात्रा करत दर्शनाला येतात पर्वताच्या कुशीत असलेलं हे मंदिर यात्रा स्थळ म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. अतिशय कठीण व खडतर प्रवास असलेल्या या यात्रेला पूर्ण करायला दोन दिवस सहज लागतात. सातपुडा रिजर्व फाॅरेस्ट असल्याने  फक्त नागपंचमीला इथे परवानगी असते,पर्वतांच्या आत बऱ्याच गुंफा असून तिथे दर्शनाला जावे लागते ,२-३लाख लोक यात्रेनिमित्त इथे येतात सापांचे अधिराज्य असलेला हा परिसर भाविकांसाठी सोपान असला तरी साहसी यात्रा स्थळ असेच याचे वर्णन करावे लागेल.       
                                                                           
                                                                                                                           
                    "कॅथलिक चर्च "व ख्राईस्ट चर्च पण पचमढीचे प्रसिद्ध आहे. हि दोन्ही चर्चेस स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली असून याचे बांधकाम ब्रिटिश कालखंडातील आहे.चर्च मधील उत्तुंग  काचा ,झुंबर, पितळी घंटा हे सगळं पुरातन ब्रिटिश काळाच्या   वैभवाची साक्ष देत आजही जतन करून ठेवल्या आहेत. कॅथलिक चर्चच्या  बाजूला दफन भूमी असून पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांची स्मृती इथे बघायला मिळते .आजही हे वेगळ्या शैलीचे चर्च पचमढीच्या सौन्दर्यात महत्वाची  भर घालताना दिसतात.
                   पचमढीतील निसर्गसौन्दर्य स्थळांचा विचार करता संपूर्ण पचमढीवरच निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केल्यामुळे पावसाळ्यात जिथे बघावे तिथे सृष्टी सौन्दर्य अशी गत असते. असो,तरी आपण पर्यटक व आम्ही जिथे भेट दिली त्याचाच विचार करू.

                                                                         




              "बायसन लॉज "हि ब्रिटिशांनी बांधलेली सगळ्यात पुरातन वस्तू समजल्या जाते,सध्या इथे टुरिजम विभागाचे ऑफिस ,फाॅरेस्ट व जिप्सीचा पास मिळायचं ठिकाण आहे. तसेच पचमढीचा नैसर्गिक वारसा सांगणार  सुंदर संग्रहालय आहे बायसन, अर्थात रान गव्याला समर्पित हे बायसन लॉज पचमढीचा जागता इतिहास आपल्याला सांगते .सुंदर समर्पक आकर्षक प्रवेशद्वार ,वाघाने केलेल्या शिकारीची जिवंत वाटणारी दृशे मन मोहून घेतात.
                                                                             
               या नंतर पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारे ठिकाण अर्थात निसर्गरम्य धबधबे ,उंचावरून खाली कोसळणारे जलप्रपात याना भेट देऊ या.
                                                                   
             " बी फ़ॉल "यालाच जमूना  फॉल पण म्हणतात ,सगळ्यात सुप्रसिद्ध असलेला हा धबधबा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे ,अतिशय खाली पायऱ्यांवरून उतरत गेलं कि याचा आनंद घेता येतो, अर्ध्या रस्त्यात एक दोन छोटे फॉल आहेत पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे,अर्थात खाली जायचे नसल्यास!  अगदी वरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज हा मधमाशीच्या गुणगुणण्यासारखा निरव शांततेत वाटावा असा किंवा मधमाशांच्या पोळ्यांची मुबलकता असावी म्हणूनही "बी फ़ॉल"नाव पडलं असावं. खूपच सुंदर आकर्षक खडकांवरून झरझरणारे पाणी बघून थकवा पार निघून जातो .इथल्या थंडगार पाण्यात यथेच्छ डुंबण्याचा आनंद सहज मिळतो.संपूर्ण पंचमढीला पाण्याचा पुरवठा इथूनच होतो.
                                                                           

                     "अप्सरा फॉल" किंवा अप्सरा विहार याच वैशिष्ट्य असं कि पडणार पाणी हे जास्त खोल नसलेल्या भागात पडत असल्याने नैसर्गिक तलाव झालेला दिसतो .लहान मूल ,व कुटुंबाबरोबर ह्या धबधब्याचा आनंद उत्तमरीत्या एकत्रित घेता येत असल्याने एक छान "पिकनिक स्पॉट "म्हणून या स्थळावर नेहमीच गर्दी असते . मुख्यतः शहराच्या जवळ असल्याने  यायला-जायला अतिशय सोयीचा आहे.
                                                                             
                     "डचेस फॉल " किंवा जलावतरण फॉल या नावाने ओळखल्या जाणारा हा फॉल, इथे खूप वरून खडकावरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य मनोहारी दिसते ,इथल्या तलावात पाणी जमा होत असल्याने आरामात पाण्यात बसून आनंद घेता येतो,आलेला थकवा या शीतलतेमुळे सहज जातो,कारण पायी चालल्यामुळे आपण थकलेले असतोच.
                                                                                   
                    "रजत प्रपात" किंवा सिल्व्हर फॉल हे नावच मुळी उंचावरून पांढऱ्या शुभ्र ,धवल रंगात पडणारे पाणी चांदीसारखे चकाकत पडते ,ज्यांना साहसी पर्यटन करायचे आहे त्याचा करिता इथे जाणे उत्तम समजल्या जाते  . अप्सरा विहार पासून हे ठिकाण जवळच आहे.
                           
                      या  शिवाय "त्रिधारा"ज्याला पिकॅडली सर्कस पण म्हणतात ,इथे दोन प्रवाह एकत्र येऊन खाली पडतात हा पण एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
                                                                           
                      "इरिन पूल",वनश्री विहार किंवा पॅन्सी पूल ,फुलर्स खुद किंवा वॉटर मीट ,सुंदर कुंड आदी तलाव ,व  इतर पर्यटन  योग्य ठिकाणे अशी बरीच आहेत. " देनवाच्या "प्रवाहाने  तयार झालेली हि स्थळे खूपच सुखासीन अनुभव देऊन जातात.
                                                                       
                      धबधबे, तलाव या व्यतिरिक्त सुद्धा  प्रेक्षणीय स्थळे पचमढीत  आहेत ,ज्यावर निसर्गानी भरभरून आपले औंदार्य दाखवत निर्मिती केली त्यापैकी "प्रियदर्शनी पॉईंट "किंवा फोर्सिथ पॉईंट (ज्याने पचमढीचा  शोध  घेतला आणि ब्रिटिश साम्राज्य उभे केले )या ठिकाणाहून सातपुड्याच्या दऱ्या -खोऱ्याचे विहंगम दृश्य बघायला मिळते. "राजेंद्रगिरी"हे भारताचे पहिल्या राष्ट्रपतींच्या नावाने विकसित केलेले नयनरम्य उद्यान त्यांच्या नेहमी भेट देण्याचे कारण ठरलेले, अतिशय सुंदर आहे. "हंडी खोह" ह्या ठिकाणी अतिशय खोल दरीचे नयनरम्य दर्शन घडते . इथून चौरागढचे मंदिर दिसते ,खोल दरीत अक्राळ -विक्राळ पसरलेली झाड बघून उरात धडकी मात्र भरते ,ह्या दरीत आधी एक नदीचा प्रवाह होता असे म्हणतात.      
                                                                                   
                                                                                                                                                             " रिचगढ"हे खडकाळ भागात खाली उतरून जावं  लागणारे ठिकाण, इथे गुंफा बऱ्याच आत गेल्यावर दुसऱ्या बाजूने उघडी झालेली दिसते. चिंचोळ्या गुंफेतून जात दुसऱ्या बाजूला निघणे हे एक प्रकारच ट्रेकिंग केल्याचे समाधान देणारे स्थळ.   " सातपुडा नॅशनल पार्क "हा पचमढीचा  एक भाग ,साग साल बांबू आदी वृक्षांची दाटी असलेल्या रम्य जंगलात रानगवा ,अस्वल ,बिबटे हरीण  तसेच, अनेक जातीचे पक्षी सहज दिसून येतात थोडा वेळ काढून आपण या सफारीचा आनंद घेऊ शकतो.
                   
                                                                           
         
                             धूपगढ हे पचमढीचे सगळ्यात उंच असलेलं ठिकाण ,इथला सूर्यास्त बघायला बहुतेक पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. उंच,वेडीवाकडी वळण घेत वेगवेगळ्या डोंगरांना वळसा घालत अरुंद अश्या कठीण रस्त्यानी इथे जिप्सीने पोहचता येते .रस्त्यात खोल दिसण्याऱ्या दऱ्या ,ते बघायला केलेली खास व्यवस्था ,वेगवेगळे "इको"पॉइंट आदी अनुभवत अर्थात गाडीतून खाली उतरायची परवानगी नसल्याने उघड्या जिप्सीतूनच या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत धूपगडला पोहचतो. इथून पण काही ठिकाणांवरून खोल दरीचे विहंगम दृश्य ,खाली सापासारखे दिसणारे वळणदार रस्ते बघायला खूप मजा येते. एखाद्या छोट्या डोंगरासारखे मोठे मोठे दगड पाहून आश्चर्यही वाटते. तिथून चालत आपण सूर्यास्ताच्या दर्शनाला निघत असताना रस्त्यात एक छान ब्रिटिशकालीन वास्तू व संग्रहालय दिसते,आजूबाजूला  विश्रांती  व कँटीनची व्यवस्था पण आहे ,तिथून खाली उतरत स्टेडियम सारख्या पायऱ्यांची व्यवस्था पर्यटकांना बसायला व सुर्यास्ताचे अनोखं दृश्य डोळ्यात साठवून ठेवायला केली आहे. इथून सूर्यास्ताची विलोभनीय दृश्ये मनात ,नजरेत साठवून ठेवताना एक वेगळीच अनुभूती मिळते. सूर्याचा लालबुंद गोळा हळू हळू नाहीसा होतानाचे दृश्य आपल्या कॅमेरात बंदिस्त करायला पर्यटकांची लगबग व त्याच्या पार्श्वभूमीवर आपले फोटो काढून घ्यायची "धडपड"बघून चांगलीच करमणूक होत होती.थोडा काळोख झाला कि लहान गावातले,तसेच पिपरीया एव्हढेच काय इटारसीचे लुकलुकणारे दिवे काळ्याकुट्ट अंधारात काजव्यांनी प्रकाशाव असं सुंदर दृश्य दूर नजरेस पडताना दिसते.
                                                                           
                                                   ह्या सर्व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद घेत ,पचमढीच अनोखं निसर्ग सौन्दर्य भरभरून डोळ्यात ,मनात साठवत व परत इथे नक्की भेट द्यायचीच असा निग्रह करत परतीच्या वाटेला लागलो आणि पचमढीचा निरोप घेतला. डोंगर माथ्यावरून खाली उतरल्यानंतर दोन्ही बाजूला बाजूला असलेल्या जंगलाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यांवर, आजूबाजूच्या पाड्यातील अनेक जण टोपलीत खवा विकत असल्याचं बघायला मिळालं .पळसाच्या पानावर एक वाटा ठेवून त्याला व्यवस्थित गुंडाळून ,एक वाटा १०-२० रुपयाला विकणारे ,गाडीला हात दाखवून थांबायचा आग्रह करणारे हे गरीब लोक बघून थोडस वाईट देखील वाटले. जगण्याचा संघर्ष किती वास्तविक असतो ,हे वातानुकूलित गाडीत बसून निसर्गाचा आनंद घेणाऱ्या शहरी लोकांना या "निसर्ग पुत्रांचा"आक्रोश थोडा जरी कानावर गेला तरी इथे येण्याचं सार्थक लाभेल असं वाटते. घरी गेल्यावर खव्याची पोळी,गुलाबजाम करायचेच हा,व त्यांचा विक्रीचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी गरज नसताना थोडी जास्तीची खरेदी केली,तीही कुठलीच घासाघीस न करता!
                                                                             
                    नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडं दूर जात हे तीन दिवस निसर्गाच्या सानिध्यत ,खूपच आंनदाने घालवले. निसर्ग किती मुक्त हस्तांनी उधळण करीत असतो याचे यथार्थ चित्रण पचमढीच्या निमित्ताने आम्हाला झाले. इतकं सुख,समाधान देणारा हा निसर्ग मानवरूपी राक्षसांच्या तावडीतून वाचवणे हि काळाची गरज आहे हे पदोपदी जाणवत होते ,या सत्कार्यात आपणही कुठेतरी आपला खारीचा का होईना पण वाटा उचलला पाहिजे याची जाणीव या पचमढीच्या दर्शनाने मनात जागवली हीच या "ट्रिपची"फलश्रुती मानवी लागेल.
                                                                         




२५-०६-२०२०                                                                                                                                 —मोहरा                                                                                                                                                                      


सोमवार, २२ जून, २०२०

सावजी- एक चव

                                                   “सावजी”
                                                   

                                        .               
                                         
                                            महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती अतिशय विविधतेने , व वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हेने नटलेली आहे. कोकणी-मालवणी ,पुणेरी, खान्देशी, कोल्हापुरी ,वऱ्हाडी  इ. ढोबळमानाने आपण त्याचे विश्लेषण करतो. प्रत्येक प्रांताची खाद्यसंस्कृती आपआपलं वैशिष्ट्य घेऊन जगणारी व कळतनकळत त्या प्रदेशाचं त्यावर "स्टॅम्पिंग "सुद्धा झालेलं असते, खाद्यप्रकारांची इतकी विविधता खचितच कुठल्यातरी प्रांतात आढळून येते,इतकं आपली महाराष्ट्रयीन संस्कृती खाद्य क्षेत्रात विविधरंगाने  फुलली आहे व समृद्ध सुद्धा झाली आहे. 
                                           विदर्भातल्या वऱ्हाडी संस्कृतीत अनेक खाद्यप्रकार आपले वैशिष्ट्य टिकवून ते या प्रांतातील म्हणून जरी ओळखल्या गेले आहेत तरी त्यात "सावजी"खाद्यप्रकार आपले स्थान बऱ्याच वरच्या पातळीवर उंची गाठून आहे ,व तो वऱ्हाडी खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य अंग म्हणून चांगलाच यशस्वी झालेला दिसतो. झणझणीत ,मसालेदार ,खमंग खाणे म्हणजे"सावजी"!
                                          मुळात सावजी हि एक विशिष्ट जात !विणकर, किंवा हलबा कोष्टी समाज म्हणजे सावजी. मुख्यत्वे ,मध्यप्रदेशातून स्थलांतरित झालेले हे लोक ,त्याकाळी नागपुरात असलेल्या एम्प्रेस मिल व इतर मिल मध्ये कामगार म्हणून कामाला लागलेत, काहीजण हातमाग ,यंत्रमागावर स्वतंत्र व्यवसाय करून विदर्भात यांनी बऱ्यापैकी जम बसवला.काही परप्रांतात सुद्धा गेलेत, मध्ये येवला इथे जाणे झाले असता काही लोकांनी आम्ही मूळ नागपूरकर आहोत असे आवर्जून सांगितले. विदर्भ प्रांतात केंद्र व राज्य सरकारी नौकरीत यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे, हे उल्लेखनीय. महादेवावर निस्सीम भक्ती असलेला हा समाज कष्टकरी,प्रामाणिक म्हणून नागपूर व आजूबाजूला स्थान करून राहिला. यांची भाषा मराठीच पण त्यात हिंदी,गोंडी  मारवाडी किंवा गुजराथी(असा माझा अंदाज!)  भाषेची सरमिसळ करून स्वतःची स्वतंत्र बोली भाषा विकसित केली .ती भाषा व त्यांची विशेष प्रकारची खाद्य पद्धती यामुळे "सावजी"खव्वयांची लाडकी चव ठरली व त्याला मान्यता मिळाली . 
                                        विदर्भात कुठल्याही शहरात फिरताना सावजी खानावळ, सावजी हॉटेल ,सावजी घरगुती भोजनालय अश्या पाट्या सहज दिसतात . अत्यंत झणझणीत ,मसालेदार ,चमचमीत ,ज्याला सवय नाही त्याच्या नाकातोंडातुन पाणी काढणारं ,कानातून वाफारे सोडणारे पण तितकाच स्वादिष्ट चविष्ट रुचकर खाद्य प्रकार म्हणजे सावजी खाणे. म्हणून तर आम्ही म्हणतो चवीने खाणार त्याला सावजी देणार!
                                      सावजी खाणं मुख्यत्वे करून जवसाच्या तेलात बनवतात पण हल्ली लोकांच्या मागणीनुसार शेंगदाणा किंवा पाम तेलातही  बनवल्या जाते, पण जवसाची फोडणी जी अनुभूती देते त्याची सर दुसऱ्या कुठल्याही तेलाला येत नाही एवढं मात्र खरं.ह्याचा मसाला कुठला हे अजूनही "गोपनीय" असल्यामुळे बाजारात मिळणारा सावजी मसाला किंवा नकली सावजी कडे तयार होणारी "डिश"हि मूळ सावजींच्या कुठल्याच पातळीवर यशस्वी ठरत नाही हे आवर्जून सांगावेच लागेल. कमीतकमी २५-३० प्रकारचे मसाल्यांचे प्रकार वापरून केलेला मसाला,कांदा ,आलं, लसूण इ .ची पेस्ट वापरून जवसाच्या तेलात दिलेली फोडणी ज्यात तेलाचे पाण्यासारखे असलेले प्रमाण काळा किंवा लालसर काळा रंगाचा असलेला तवंगा सारखा रस्सा पाहताच मिळमिळीत खाणाऱ्यांच्या पोटात बघूनच पोटात गोळा उठतो पण असली डिश पुढ्यात येताच ,जीव कासावीस होणारे ,त्यावर तुटून पडणारे सावजी प्रेमी बघितले कि आपल्याला आपला जन्म व्यर्थ तर नाही ना अशी शंका येऊन घाबरत घाबरत खाण चालू केलं कि लक्षात येत अरे,हे दिसते तस अजिबात नाही व आपण  खाताना आपल मन कधी डोलायला लागते,आणि लगेच सावजीच्या प्रेमात पडून त्याला आपलस करित
 कळात- नकळत कधी  सावजी भक्त होतो हे कळतच नाही इतकी किमया हा प्रकार आपल्या बाबतीत करतो हे स्वानुभव व बरेच लोक सांगतात.
                                                                           
                                   मुख्यतः सावजी म्हणजे जास्ती तर नॉनव्हेज खाण ! अर्थात शाकाहारी लोकांसाठी पण अनेक प्रकार आहेत,सावजी मध्ये नॉनव्हेज अतिशय चवीने खाणारे खव्वये आपल्याला सहज दिसतात चिकन अर्थात गावठी,मटण ,अंडाकरी फिश,झिंगे हे नेहमीचे प्रकार याशिवाय सुंदरी (बकऱ्याच्या आतड्यापासून बनवलेले) खिमा ,कलेजी ,मुंडी,भेजा,खूर (पाया) असे अनेक अफलातून प्रकार खाणाऱ्याच्या जिभेवर रेंगाळत असतात ह्या खाण्याच्या नुसत्या कल्पनेने अंगावर शहारे येतात,खाण्याच स्वर्गीय तारांकित सुख काय असत याचा आपण अंदाज लावू शकतो.  सर्वच काही नॉनव्हेज खाणारे नाहीत त्यामुळे खास शाकाहारी लोकांसाठी हिरव्या वांग्याची भाजी, डाळ-कांदा ,खसखसची भाजी, पाटोडी रस्सा, पनीर, गवार, शेवभाजी ,पोपटाची उसळ इ. प्रकारचा "चॉइस"असतोच. त्यामुळेच सावजी खाताना व्हेज,नॉनव्हेज अशी कोणाचीही  पंचाईत होत नाही व खाण्यासाठीच जन्म आपुला या युक्तीने सगळेच "सावजींचा"मस्त आस्वाद घेतात. या जेवण्यातला अजून एक छान प्रकार म्हणजे "लसणी भात "भात फ्राय करून त्यात लालसर तळलेला लसूण मुक्त हस्ताने टाकून बनवलेला हा भात खूपच वैशिष्ट्यपूर्ण चवीला लागतो ,त्याच्यावर नुसतं लिंबू-मीठ जरी टाकून खाल्ला तरी एक अवर्णनीय चवीची अनुभूती मिळते,असा हा लसणी भात सावजी खाण्यातला एक अपरिहार्य अंग मात्र नक्की  आहेच.
                                    सावजी प्रकार आता सगळीकडे मिळतो, छोट्या-मोठ्या हॉटेल मध्ये ,ढाब्यांवर एवढंच काय अगदी थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा २-३ भाज्या या आवर्जून सावजी प्रकारच्या असतात,पण ती "मूळ" चव मात्र ठराविकच लोकांकडे मिळते. नागपूरला गोळीबार चौक ,जागनाथ  बुधवारी,गांधीबाग ,टेलिफोन एक्सचेंज चौक हि खास "ऍथेन्टिक"सावजी मिळायची ठिकाण ,तशी प्रत्येक एरीयातच काही धाबे,खानावळी आपलं नाव अजूनही टिकवून आहेत आणि साहजिकच दर्दी लोकांची तिथे नेहमीच वर्दळ असते.
                                                                               
                                  सावजी खाण्याची खरी मजा व एकदम अस्सल खायचे असल्यास त्यांच्या भागात, विशिष्ट खानावळीत जायचं, साधारण जागा, लाकडी टेबल -बेंच अर्थात खड्डे पडलेले व घरीच निळ्या-हिरव्या रंगाच्या पेंट ने रंगवलेले ,त्यावर बसायची व्यवस्था! बरोबर "आपला स्टाॅक" किंवा "चपटी"असल्यास त्यांची काहीच हरकत नसते,बहुतांश सावजींकडे काही अपवाद सोडल्यास हि सोय गिऱ्हाइकांचे व्यापक हित लक्षात घेऊन,त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून,पूर्णतः  कानाडोळा करून ,प्रशासनाची आर्थिक संबंध मधुर ठेवून विशेष परवानगीने  राजरोसपणे सुरु असते त्यामुळे गिर्हाईक येथे तेवढ्याच हक्काने व बिनधास्तपणे आपला घसा सहज "ओला"करून परमानंदाची अनुभूती घ्यायला बक्कळ गर्दी करतात   
                                 
                               सावजी जेवणाचं आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गरम -गरम फुलके,पोळ्या . कुठल्याही सावजीकडे हे तुम्हाला सहज बघायला मिळते,हल्ली ज्वारीची ,बाजरीची भाकरी पण "ऑन डिमांड"मिळते पण गरम पोळ्या अगदी घरच्या मायेने वाढल्या  जातात हे महत्वाचे. काही घरगुती खानावळीत जागा फुल्ल असल्यास किंवा तुम्ही सहकुटुंब गेल्यास चुलीच्या बाजूला पाट मांडून तुमची सोय अगत्याने केली जाते व पोळ्या करणारी माउली गरम पोळ्या वाढून आपली क्षुधा शांती सहजरित्या करून धन्यता मानते.
                              बहुतांश ठिकाणी सावजी भाजी प्लेट प्रमाणेच मिळते पण गरम पोळ्या व भात मात्र "अनलिमिटेड"असतो त्या मुळे मोठ्या हॉटेलमध्ये दर बघत जेवण्याची इथे गरजच नसते ,मेन्यू कार्ड हि असतेच असे नाही  दर-पत्रक मोठया अक्षरात टांगलेले आपल्याला सहज दिसते मग तुम्ही कुठल्याही टेबलावर बसा. तुडुंब जेवा,पोटभर जेवा हा संदेश देणारं जेवण हे सावजींचेच.
                              आता सावजी हा ब्रँड झाला आहे . आमचंच सावजी हे अस्सल अशी होड लागलेली दिसते आहे ,बाहेरून येणारे ह्याला सहज भुलतात ,काहीतरी तिखट-जाळ सावजींच्या नावावर खपवून दुसऱ्यादिवशीही त्याची "आठवण"येईल याची तजवीज करणार जेवण खायला घालून कळत -नकळत अस्सल सावजींची बदनामी करायचं काम करत असतात पण चोखंदळ खवय्ये "अस्सल"ते बरोबर शोधून काढून सावजींचा अमर्याद आनंद लुटतात व तृप्त होतात . अस्सल सावजींचा रस्सा आपण सहज पिऊ शकतो,त्याची एकदा चव कळली कि खर- खोटं पटकन लक्षात येत.
                     काही ठराविक सावजींची खूप चालती आपल्याला बघायला मिळते ,लांबून,परगावावरून सुद्धा सावजींच्या शोधात येणाऱ्यांची कमी नाही,माझ्या पुतण्या व त्याचे मित्र ,असे अनेक खवय्ये आपल्या वास्तव्यातील काही दिवस सावजी करताच राखून ठेवतात व त्या जेवणाचा आनंद घेतात. आपल्या तळपत्या जिभेला मात्र पर्वणी देण्याच काम करत असतात. नागपूरपासून ४०किलोमीटर लांब असलेलं उमरेड मधील काही सावजी महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात प्रसिद्ध आहेत.तिथे सावजी जे खातात त्यांची खाताना ब्रम्हानंदी टाळी नक्कीच लागत असते व आपण स्वर्गीय खात असल्याची जाणीव मेंदूच्या शेवटल्या कोपरयात होत असते. तिथून मुंबई ,पुणे सारख्या ठिकाणी विमानाने पार्सल नेणारेही काही कमी नाहीत,उमरेड मधील सावजी हे शेजारीच असण्याऱ्या भिवापुरी मिरचीच्या सानिध्याने जरा जास्तच "ठसकेबाज' झाले असावेत म्हणूनज तर एवढे लोकप्रिय झाले आहेत.
                                                                           
                          मुंबई -पुण्या सारख्या ठिकाणी नागपुरातील काही प्रसिद्ध शेफ "सावजी फेस्टिवल "चे आयोजन करून याची ख्याती सर्वदूर पोहचवण्याचे महत्कार्य करीत आहेत. नागपूरला आलं कि सावजी खाल्ल्याशिवाय जायचेच नाही असा संकल्प करून येणारे आता बरेच दिसत आहेत. अधिवेशन काळात सगळेच सावजी तुडुंब भरलेले नेहमीच दिसतात ,हया सगळ्या  जरी सकारात्मक बाजू असल्या तरी कुठेतरी सावजींचा अस्सलपणा नाहीसा झालेला दिसतो आहे अतिशय तिखट म्हणजे सावजी असं समीकरण स्वतःचा फायदा करून घेणारे सावजींच्या नावावर करताना दिसत आहेत हि खरच चिंतेची बाब ठरते आहे. ती "चव"कुठेतरी लुप्त तर होणार नाही ना?अशी शंका मनाला चाटून जाते ,पण चवीने खाणारे दर्दी खवय्ये आहेत तो पर्यंत ह्याला कोणी धक्का लावणार नाही हा आशावाद पण तेवढाच प्रबळ वाटतो. मध्यंतरी, सावजी प्रकाराला जीआय टॅग मिळावा म्हणून काही जण प्रयन्तशील असल्याचे वाचनात आलं होत.
                           आजच्या व्यापारीकरण्याच्या व धंदेवाईक जगताच्या दलदलीत हि "मूळ व अस्सल" सावजी चव कुठे नाहीशी होऊ नये ,एक उत्तम मसालेदार ,झणझणीत ,चमचमीत प्रकार आम्हा खवय्यांच्या जिभेवर सतत रेंगाळताना त्याच महत्व तेवढेच अबाधित राहावे हीच सगळ्या "सावजी प्रेमींची' मनापासून इच्छा नक्कीच आहे.

                                                                               


21-06-2020                                                                                                                      ---मोहरा
                                                                                 

सोमवार, १५ जून, २०२०

डोहाळे-कविता

                                                                                      डोहाळे -कविता
          माझा पुतण्या कौस्तुभ याच्या बायकोचा म्हणजे श्रुतीचा डोहाळे सणाचा कार्यक्रम आम्ही नुकताच साजरा केला. लॉकडवून मुळे ,व ते दोघे अमेरिकेत असल्याने आम्ही ई -डोहाळे सण ऑनलाइन साजरा केला ,पंधरा-वीस कुटुंबांनी हा सण धुमधडाक्यात  आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला रंगत आणून एक अभिनव प्रयोग मजेत यशस्वी केला .त्या निमित्याने मी चार ओळी सादर केल्या ---------                                                                                                                                             सण श्रुतीचा -"डोहाळ्यांचा"
                                                                     ---ई-डोहाळे------

                               
  करू साजरा आज श्रुतीचा आनंदे अभिनव  सण हा डोहाळे !
 जमले बघण्या आज स्वकीय-आप्तगण हे सगळे !१!                                                                                           दूर देशी वसे दोघे ,म्हणुनी आंतर जाला द्वारा करू काही आगळे !                                                                काव्य,नाच गायने प्रसंगी करती  सर्व नित वेग-वेगळे !२!                                                                             उत्साहाला उधाण येति पाहता  अति रम्य हे साज सोहळे !                                                                               पणज्या -आज्या पुसती बघून हे पाणावलेले निज डोळे!३!                                                                             मनोमनी कल्लोळ दाटे भावनांचे ,घेऊनि निरांजन कवतुकें ओवाळे !                                                                    सज्ज सारे घरी आपुल्या करुनि गोड शिरा वरी कांदा-भाजी तळे !४!                                                                कौस्तुभ रंगवी मनी संसाराचे सुख चित्र मात्र आज वेगळे!                                                                                  अधीर जाहला मनी  बघण्या बाळाची सोनपाऊले हि कोवळे !५!
  वाट पाहती आजी-आबा ,नाना-नानी करोनाचे संकट कधी टळे !                                                                       जाऊ मग सत्वरी आम्ही अमेरिकेला पुरवाया श्रुतीचे  डोहाळे!६!                                                                         लहान नणंदा-दीर उभी घेऊनि हाती खेळावया छानसे खुळखुळे !
 सारखे पुसती सांगा कधी मिळे ग आम्हास बाळासंगे नव-नवी खेळे !७!                                                            म्हणती पणज्या बघितले असे आम्ही कितीतरी ऊन-पावसाळे !                                                                          हुरहूर तरी लागी जीवाला कसे बरे असेल कौस्तुभ-श्रुतीचे  बाळे !८!
 आज्याही गाती पाळणा सुंदर सुस्वरें ,सूर नाद लाजवी आज कोकिळे !                                                        कल्पनेच्या विश्वी लागल्या सजवू सहज अनुपम ,शानदार झोपाळे !९!                                                                 तुम्हा सगळ्यांचा बघता आग्रह केले हे काव्य कसे तरी बळे -बळे !                                                                      म्हणती मोहरा बस आता पुरे करा तुमचे नसते विदुषकी चाळे !१०!                                                                      करू साजरा आज श्रुतीचा आनंदे  अभिनव सण हा डोहाळे ------------------!
                           
                                                 
  १३०६२०२०                                                                                                                                                                                                                                                                             --मोहरा
               

मंगळवार, ९ जून, २०२०

ओरीओ

                    “ओरीओ”
                          

             ओरीओ हा पण इंग्लिश कॉकर्स स्पॅनियल जातीचा ,मूळ जात स्पॅनिश, "कॉकर्स वूड"या पक्षाची शिकार झाल्यानंतर त्याला नेमक्या त्या जागेवरून हुडकून काढून मालकापर्यंत पोचवणे हे यांचे मुख्य काम. म्हणून या प्रजातीला" कोकर्स स्पॅनियल" म्हणून ओळखल्या जाते. अमेरिकन कॉकर्स स्पॅनियल व इंग्लिश कॉकर्स स्पॅनियल अश्या दोन यांच्या प्रजाती आहेत. अतिशय माणसाळलेली प्रजाती म्हणून जगभरात यांची गणना होते. कुटुंबाचा "मोस्ट फ्रेंडली" साथीदार म्हणून खूप लोकांनी या प्रजातीला आपल्या घरात स्थान दिले आहे ,दिसायला अतिशय लोभसवाणे ,पण काटक यामुळेच बऱ्याच घरात यांनी आपले स्थान पक्के केलेलं दिसते
                                           ओरीओ म्हणजे फ्रेंच मध्ये "सोन" ,म्हणूनच जावयानी लग्नाच्या आधी मुलीला हा सोन्यासारखा ओरीओ "गिफ्ट"म्हणून दिला,त्यामुळे नवऱ्याबरोबर हाही तेवढाच लाडका. तस ओरीओ. म्हणटल कि आपल्या डोळ्यासमोर उभं राहत ते ओरीओ बिस्कीट ,चॉकलेटी काळ  आवरण व आतमध्ये पांढरे मस्त मलईदार क्रीम त्यामुळे लहान मुलांचं अत्यंत प्रिय , हा ओरीओ सुद्धा असाच पूर्ण काळाकुट्ट पण क्रीम सारखाच गोड ,लोभसवाणा! अंगावर लांबसडक नाही पण चेहरा ,पायावर  छान केशसंभार असलेला ,कान जमिनीपर्यंत पोहचतील असे लांब त्यामुळे सासरचं हे "झापर" कुत्र आपण पाहिल्याबरोबर  प्रेमात पडाव  असं. सासरच्या कुत्र्याला हाड-हाड न करता त्याला आदराने संबोधावे ,त्याला सुद्धा अहो,जाओ करावं असं आपल्याकडे गमतीने म्हंटल्या जाते, पण आजकाल जावयालाच नावाने अरे-कारे केल्या जाते तीथे त्यांच्या कडल्या कुत्र्यांचे काय?असो, पण आमच्या सगळ्यांचा तो ओरया, ओरू, ओरीओ ,बाबू ,तोतो अशी कितीतरी वेगवेगळी नाव.
             
                                         ओरीओचे वय जेमतेम पाच वर्षे त्यामुळे नजर सतत भिरभर व मस्ती करायला तत्पर त्याच्यामुळे खेळण्यात छान मजा येते.समोरच आजी-आजोबा राहत असल्यामुळे याचा अर्धा मुक्काम त्यांच्याकडेच. आजी पण प्रेमाने त्याच्या खाण्याच्या वेळा ,औषध सगळं व्यवस्थित सांभाळत असते  आजीची साडी हा त्याचा" वीक पॉईंट",कुठेही दिसली कि हा घेऊन येणार व तिच्यात तोंड खुपसून झोपणार ,अर्थात आजीची उबदार माया त्याला त्यातून मिळत असावी  ओरिओच एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकटा सुद्धा दिवसभर राहतो ,बाल्कनीत बसून घरचे कोणी दिसतात का बघत ,पण अतिशय शांतपणे गोंधळ न करता इतकं कि शी-सु वर सुद्धा पूर्ण कंट्रोल करून हे विशेष. आजी कडे असला आणि फोन ची रिंग वाजली कि लागलीच कान टवकारून आपल्याच आई-बाबांचा फोन असेल म्हणून पळत बाल्कनीत धावत जाणे व बघत राहायचे खाली कोणी दिसते का,आलं तर नाही ना .... ?
                           
                               मुंबईकर असल्याने थोडी शिस्त पण अंगात भिनली आहेच ,गोळी केळातून न चुकता घेणारा ,वेळ झाली कि गोळीच्या बाटलीकडे बघत मला द्या, वेळ झाली सुचवणारा . केळ अत्यंत आवडते म्हणून समोर नाही पण माघारी मी त्याला केळकर म्हणतो (कोकणस्थ आडनाव असल्यामुळे थोडं भान ठेवावं लागते) याचेही कान दूध पिताना मात्र बांधावेत लागतात .ठराविक पण मोजकाच आहार पण आमच्या भाषेत "टूकाराम",खाताना सतत टुकणे ह्या स्वभावधर्माला चोखपणे  जपणारा.
                              कार मध्ये बसणे हा ओरीओचा आवडता छंद !बाहेर जायचं असलं कि याला बरोबर कळते ,स्वतःच पटकन कारच्या दारासमोर आधीच जाऊन उभा राहणार आणि दार उघडले कि उडी मारून आत बसायचे चक्कर मारल्याखेरीज उतरायचंच नाही  हे ठरलेलं .ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसून काचेच्या बाहेर तोंड काढून बाहेरची गंमत बघत बसणे खूप आवडते . घरचाच मेम्बर असल्यामुळे जिथे "पेट्स अलाऊड"असतात त्याच हॉटेलला वीक एन्ड ला हा जाणार व घरच्यांबरोबर मस्त वीक एन्ड साजरा करणार. चारचाकी शिवाय ऍक्टीव्हा च्या मधल्या जागेत बसायला सुद्धा याला खूप आवडते ,जवळपास जायचे असले कि मागच्या सीटवर स्वारी पाय घट्ट रोवून छान बसली असते.
                           
                               ओरीओ हेच सध्या विश्व् असल्यामुळे त्याचे लाड सुद्धा खूप केल्या जातात .मुंबईच्या पावसात बाहेर फिरायला कस न्यायचे म्हणून याला रेनकोट आणला भर पावसात रेनकोट घालून पावसाची मजा घेत सोसायटीच्या आवारभर फिरणे हा याचा हक्कच! पहिल्या दिवाळसणाला यायचं मग ओरीओला का नाही न्यायचं ?म्हणून मुंबई-नागपूर कारचा प्रवास मजेत करून त्यानेही लेक-जावयाबरोबर आपला दिवाळसण उत्साहात साजरा केला अर्थात प्रवासात शहाण्यासारखा राहून.
                              एकदा मुलीकडे गेलो असताना आमची आई घेते अशीच "थॉयराइड"च्या गोळीची बाटली दिसली जरा काळजीयुक्त स्वरातच मुलीला त्याबद्दल विचारले, अरे,बाबा ती ओरीओची गोळी आहे सकाळी उठल्यावर त्याला द्यावी लागते !म्हणटल धन्य आहे ,कुत्र्यानापण थॉयराइड असतो हे ज्ञानामृत मला त्या दिवशी मिळाले .आता सगळा जमानाचं बदलला आहे,काही घरी माणसांना कुत्र्यासारखं तर काही घरी कुत्र्यांना माणसासारखं वागवलं जाते हे कटुसत्य मात्र कुठेतरी अधोरेखित करता आलं. हे सगळे कुत्रे तसे नशीबवान म्हणटले पाहिजे त्यांना "कुत्रा"म्हणून संबोधले तरी मालकांना खूप राग येतो .माणसांना माणूस न समजणारी हि पिढी (अर्थात सगळी तशी अजिबात नाही हे तेवढेच कौतुकास्पद व सत्य)कसा विचार करते हे पाहून आश्चर्य वाटते ,पण मुक्या प्राण्यावर दया करा हे मात्र शब्दशः जगतात हे बघून मन थोडं सुखावत सुद्धा.
                         
                                     आमच्या लहानपणी आमच्या घरचा आकू ,टिपू चिडेल म्हणून लांबूनच आंघोळ घालायचा कार्यक्रम व्हायचा ,कुत्र्यांचं साबण म्हणून एक विशिष्ट ब्रॅंडनेम असलेला साबणच हमखास लावले जायचे, पण आता ओरीओ सारख्यांची आंघोळ म्हणजे एक सोहळाच असतो त्याचा साबण ,शाम्पू, ब्रश,कंगवा ,मऊशार टॉवेल आदी सज्ज उपकरणांनी हा सोहळा पार पडल्या जातो एवढेच काय त्याचे दात घासायला विशिष्ट पेस्ट आणि ब्रश सुद्धा! ऐकावं ,बघावं ते नवलच .पण ओरीओला आंघोळ अजिबातच आवडत नाही प्रत्येक लहान मुलांशी बोलताना एक विशिष्ट शब्द असतात ,त्याला काही अर्थ नसतो पण ती भाषा त्याला आणि घरच्यांनाच कळत असते ,तसेच याच्या भाषेत आंघोळ म्हणजे "तो-तो " हा शब्द जरी ऊच्चारला. तरी हा पलंगाखाली दडून बसणार ,बाहेर पाय धरून ,ओढत त्याला बाथरूम मध्ये ढकलत न्यावे लागणार इतकी दहशत तो-तो शब्दाची आहे .
                           आपण क्षेम कुशलचा फोन केला कि त्याच्या कानाला फोन लावून बघ आई-बाबांचा फोन आला म्हणून आम्ही इकडून लाडा - लाडाने ओरीओ आवाज देणार ,त्याला कळते कि नाही देव जाणे पण तो ढिम्म ,स्थितप्रज्ञासारखा उभा राहणार ,मग व्हिडीओ कॉल ने त्याचा चेहरा बघून आपण कौतुक करून फोनचे सोपस्कार पार पाडायचे .लांब राहून जवळ असण्याचं समाधान बाळगायचे !
                             
                            एकदा तर ओरीओनी गम्मतच केली बेसनाचे भरपूर लाडू करून आजीने परातीत थंड करायला ठेवले हा कधी त्यांचा डोळा चुकवून स्वयंपाक घरात शिरला कळलेच नाही आणि भराभर त्याने सगळे लाडू क्षणार्धांत फस्त केले ,हा काय जिभल्या चाटत आला म्हणून आजीने बघितले तर परातीत एकही लाडू नाही ,मुका प्राणी फटके पण मारू शकत नाही ,पण पुढचे दोन दिवस त्याने आयुष्यातली पहिली "डिसेंट्री "मात्र अनुभवली ,अर्थात तेव्हा तो लहान होता मग समज आल्यावर आजीच्या "बाबूने" असा बावळटपणा कधी  केला नाही.
                            तशी कॉकर्स स्पॅनियल जात हुशारच त्यामुळे ओरीओला घरीच बऱ्यापैकी ट्रेन केल्या गेलं आहे ,नाही म्हणटल तर खाण्याच्या वाटीला तोंडसुद्धा लावत नाही,बघत बसतो बिचारा पुढील आदेशाची वाट बघत. "हाय-फाय"( म्हणजे आपले आलू, टिपू,पंजा द्यायचे ते ),दोन पाय वर घेऊन बसणे ,शी-सु घराबाहेरच करायला जाणे ,उडी मारून बिस्कीट गपकन गिळणे आदी प्रकार छान जमतात
                           
                        थोडा लहान असताना त्याला नागपूरला आणले होते,नॉडी आणि ओरीओची तेव्हा छान गट्टी जमली होती दोघांच्या वयात अंतर खूप एक बालवाडीतला तर दुसरा थेट हायस्कुलमधला ,पण कुठे भांडण नाही ,तंटा नाही किंबहुना लहान्यांच्या मस्तीला जाने दो बच्चा  है ...... म्हणून दुर्लक्ष करणारा ,वडीलकीच भान सहजपणे जोपासणारा आणि हा छोटा दादा दादा करीत सतत त्याच्या मागे-पुढे दिवसभर करणारा !दादाच जेवण -पाणी पटकन येऊन संपवणारा बालसुलभ खोडकर ,दादा तितकाच स्थितप्रज्ञ ,शहाण्यासारखा ,छोट्याच कौतुक बघणारा ,त्यामुळे जो पर्यंत तो होता तो पर्यंत दोघांनीही एकमेकांना समजून घेतले ,वेगळा विदर्भ,आमची मुंबई न करता "संयुक्त महाराष्ट्र "च्या भूमिकेत कायम दिसले.
                                आता ओरीओच बालपण संपून तारुण्यात तो पदार्पण करतो आहे त्यामुळे ती मस्ती, सैरावैरा पाळणे,पटकन येऊन काहीही खाणे याच्यावर नक्कीच मर्यादा आल्या आहेत पण ओरीओ म्हंटल की त्याच बालपण डोळ्यासमोर उभं राहत व कळत नकळत आपणही त्या सुरम्य आठवणीत गुंतून पडतो एवढं मात्र खरं !
                       
                                                                                                                                         
09062020                                                                                    मोहरा                                                                                                                                                                                                                                                        


झंडू

                                               "झंडू"-बाम नाही एक विशेषण                                                   ...